सर्वसाधारण माहिती

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला सांगली हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

शेती -

जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यातल्यात्यात तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत -तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

जिल्ह्यात घेतल्या जाणार्‍या विविध पिकांचा हंगामनिहाय तपशील पुढील रकान्यात दिला आहे -
अं.क्र. हंगाम प्रमुख पिके
१. खरीप तांदूळ, ज्वारी, तंबाखू
२. रब्बी गहू, हरभरा
३. खरीप व रब्बी ज्वारी, ऊस

जिल्ह्याची लोकसंख्या व अन्य माहिती -
अं.क्र. शीर्षक माहिती
१. जिल्हाची लोकसंख्या २८,२२,१४३
२. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९६६
३. स्त्रिया १३,८६,४१५
४. पुरुष १४,३५,७२८
५. ग्रामीण लोकसंख्या २१,०२,७८६
६. शहरी लोकसंख्या ७,१९,३५७
७. साक्षरता (एकूण) ८१.४८ %
८. पुरुष साक्षरता ८८.२२%
९. स्त्री साक्षरता ७४.५९%

कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून माणगंगा,मोरणा,वारणा,येरळा,अग्रणी,बोर या जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली येथे धरण असून कुची, अंजनी, भोसे, कोसारी, वज‘चोंडे, रेठरे, आटपाडी इत्यादी लहान-मोठी धरणे आहेत. याशिवाय कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. पवन उर्जा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील गुढेपाचगणी व ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत.

बळीराजा धरण हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प खानापूर तालुक्यात येरळा नदीवर उभारण्यात आला आहे. हे छोटे धरण शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व अभियंते यांनी एकत्र येऊन बांधले आहे. शास्त्र ,तंत्रज्ञान, पर्यावरण, पाणी अडवण्याचे व साठवण्याचे पारंपरिक-आधुनिक मार्ग आणि मानवी मूल्ये या सर्व घटकांचा संतुलित विचार हे धरण बांधताना करण्यात आला आहे. प्रामुख्याने बाळावाडी व तांदुळवाडी या खेड्यांच्या परिसरातील सुमारे ९०० एकर जमिनीला या धरणाचा फायदा होतो. ‘छोट्या धरणांतून अधिक विकास’ या चळवळीचे बळीराजा धरण हे एक उत्तम प्रतीक म्हणता येईल.

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून वर्षात सरासरी ५० ते ७५सेमी एवढा पाऊस जिल्ह्यात पडतो. पश्चिमेकडील शिरोळे तालुक्यात जास्त पाऊस पडतो, तर तो पूर्वेकडे कमी होत जातो. मिरज येथे फक्त ६४०मि.मी.एवढाच पडतो. खनिजांचा विचार करता जिल्ह्यात प्रामुख्याने शिराळा तालुक्यात बॉक्साईटचे साठे सापडतात.

उद्योग -

जिल्ह्यात सांगली, मिरज,विटा,कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे.


साखर कारखाना सूची -
अं.क्र. साखर कारखान्याचे नांव ठिकाण
१. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली
२. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना म्हैसाळ,मिरज
३. विश्र्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यशवंतनगर(चिखली), शिराळा
४. निनाईदेवी सहकारी साखर कारखाना करुंगली, शिराळा
५. हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखाना वाळवा
६. सर्वोदय सहकारी साखर कारखाना कारंदवाडी, वाळवा
७. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, वाळवा
८. यशवंत सहकारी साखर कारखाना नागेवाडी, खानापूर
९. महंकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू नगर, कवठे-महांकाळ
१०. सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी, कडेगाव
११. माणगंगा सहकारी साखर कारखाना लोनार सिद्धनगर, आटपाडी
१२. डोंगराई सागरेश्र्वर सहकारी साखर कारखाना रायगाव, कडेगाव
१३. तासगाव सहकारी साखर कारखाना तुरची, तासगाव
१४. राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी, जत
१५. वाटेश्वर सहकारी साखर कारखाना वाटेगाव, वाळवा
१६. शिवाजी केन प्रोसेसर्स सहकारी साखर कारखाना औंढी, शिराळा

सांगली येथील हळद,गूळ व शेंगांची बाजारपेठही प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील पहिली सूतगिरणी (लिंबा सूत गिरणी) दादासाहेब वेलणकर यांनी सुरू केली होती.

अं.क्र. उद्योग/व्यवसाय ठिकाण
१. शेतीची अवजारे किर्लोस्करवाडी (किर्लोस्कर समूह)
२. हिर्‍यांना पैलू पाडणे विटा, माहुली,नेलकरंजी
३. अडकित्ते तयार करणे बागणी
४. बेदाणे, मनुका तयार करणे तासगाव
५. सूत गिरणी सांगली
६'. कापड गिरणी माधवनगर, मिरज
७. दूध उत्पादने भिलवडी, तासगाव (चितळे उद्योग समूह)

प्रशासन

प्रशासन :जिल्हयात एकूण दहा तालुके आहेत.- (संदर्भ जनगणना २००१)

अं.क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१. शिराळा ६२६.२ १,५८,२९८
२. वाळवा ७९०.१ ४,२७,३७७
३. पलूस २७६.० २,१६,५६६
४. खानापूर २,४२७.३ २,५८,२३१
५. आटपाडी ८८५.० १,२५,२६३
६. तासगाव ८८३.४ २,१३,२०५
७. मिरज १,१०५.५ ७,५६,०४८
८. कवठे-महांकाळ ९३६.० १,४४,५९६
९. जत २,२५२.० २,८३,९५०
१०. कडेगाव - -

जिल्हयातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे आहेत.

अं.क्र. तपशील संख्या नावे
१. महानगरपालिका ०१ सांगली-मिरज-कुपवाड
२. नगरपालिका ०५ इस्लामपूर, तासगांव, आष्टा, विटा, जत
३. नगर पंचायत ०५ खानापूर, शिराळा, कवठे-महांकाळ, कडेगाव, पलूस
४. पंचायत समिती १० शिराळा, वाळवा, पलूस, खानापूर, आटपाडी, तासगाव,मिरज, कवठे-महांकाळ ,जत, कडेगाव
५. ग्रामपंचायत ६९९ --

राजकीय संरचना
१. लोकसभा मतदारसंघ :

लोकसभा मतदार संघात सांगली, मिरज, पलूस-कडेगांव, खानापूर-आटपाडी ,तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे ६ मतदारसंघ आहेत. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.

२. विधानसभा मतदारसंघ :

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत-मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६० मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत.


प्रशासकीय रचना

जिल्हा मुख्यालय सांगली हे आहे. प्रत्येक तालुक्याचे ठिकाण तहसील अथवा तालुका मुख्यालय आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय सोसायासाठी ३ महसूल उपविभाग केलेले आहेत.

१. वाळवा उपविभाग-वाळवा, शिराळा.

२. मिरज उपविभाग-मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ.

३. खानापूर उपविभाग-खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस.

पोलीस प्रशासन

जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय सांगली हे आहे. ६ पोलीस उपविभाग असून त्यात अंतर्भूत पोलीस स्थानके पुढीलप्रमाणे-

१. सांगली शहर-सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्राम बाग, वाहतूक विभाग सांगली.

२. मिरज विभाग-मिरज शहर, मिरज ग्रामीण,एम.आय.डी.सी.,वाहतूक विभाग मिरज.

३. इस्लामपूर विभाग-इस्लामपूर,कोकरूड, शिराळा, कुरळप, कासेगाव, आष्टा.

४. तासगाव विभाग-तासगाव, कुंडल, पलूस.

५. विटा विभाग-विटा, चिंचणी-वांगी, कडेगाव, पलूस.

६. जत विभाग-जत, उमदी, कवठेमहांकाळ


दळणवळण -

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.


सांगलीचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर -
अं.क्र. शहरापासून अंदाजे अंतर अंतर (कि.मी.)
१. मुंबई ३९१
२. नागपूर ७६३
३. औरंगाबाद ४५७
४. सांगली १७९
५. पुणे २३१